नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाचा कहर, लॉकडाऊनचा जुलूम यामुळे जनता आधीच त्रस्त असताना, आता निसर्गाच्या माऱ्याने पुरते बेजार होणाची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.
आज (दि. २८) रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळीवाऱ्याचा फटका येथील कांदा व्यापारी श्रीधर कोठावदे यांच्या कांदा चाळीला आणि जवळच असणाऱ्या किराणा दुकाणाला बसला आहे.
शहरापासून एक कि.मी. अंतरावर रावळगांव फाट्यावर श्रीधर कोठावदे यांची कांदे साठवण चाळ आहे त्यामध्ये सुमारे सहाशे ते आठशे क्विंटल कांदा साठवण असताना अचानक सुटलेल्या पाऊस-वादळाने ही चाळ जमिनदोस्त झाली. त्यामुळे चाळीतील कांदे पुर्णपणे ओले झाले.
चाळीवरील आच्छादन लगतच असणाऱ्या किराणा टपरीवर कोसळल्याने टपरी पलटी झाली त्यामुळे टपरीच्या आडोश्याला उभे असणारे वाटसरु भरत रामंद्र मोरे, वैभव भरत मोरे हे त्यांच्या दुचाकीसह दाबले मात्र सुदैवाने बचावले.
लॉकडाऊनमुळे दुकान बंद असल्याने कोणाच्याही जीविताला हानी पोहचली नसली तरी किराणामालाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती किराणा दुकानचालक बाळासाहेब बच्छाव यांनी दिली.
या वादळी पावसाने शहरात, तालुक्यात ठिकठिकाणी फळशेती, कांदा चाळ, अन्य पिकांचेही मोठे नुकसान केल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
सटाणा-मालेगाव रस्त्यावरील अनेक झाडांच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्या, तर काही घरांवरील छत उडाल्याच्या घटना या वादळी पावसामुळे घडल्या.
या अस्मानी संकटाने सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत. शासन-प्रशासन काही दिलासा देईल काय याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अमोल बच्छाव, सटाणा (नाशिक)