बोलपूर : वृत्तसंस्था – गेल्या 9 महिन्यांपासून देशावर कोरोनाच संकट असल्याने मोदी सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी कायद्यांची अंमलबजावणी थांबली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (सीएए) नियम तयार करण्याचे काम बाकी आहे. कोरोनाची साखळी खंडित झाल्यावर आणि लसीकरण सुरू झाल्यावर यावर विचार सुरू केला जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit shah) यांनी दिली.
अमित शहा सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या दरम्यान शहांनी मोदी सरकारच्या आगामी लक्ष्यांची माहिती दिली. देशातील कोरोना रुग्णांची संख्या एक कोटीच्या पुढे गेला आहे. दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा नियंत्रणात येताना दिसत आहे. सध्याच्या घडीला देशभरात लसीकरणाची तयारी सुरू आहे. जवळपास 260 जिल्ह्यांमध्ये 20 हजार कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्रशिक्षण दिले आहे. कोरोनामुळे अद्याप बरीच प्रक्रिया बाकी आहे. जितक्या लवकर कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरू होईल, तितक्या लवकर आम्ही याबद्दल विचार करणार असल्याचे शहा म्हणाले.
केंद्राकडे बोट दाखवण्यापूर्वी नियमांकडे लक्ष द्याः शहांचा ममता बॅनर्जीवर निशाणा
यावेळी शहांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीवरून मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींना लक्ष्य केले. नड्डा यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांना समन्स जारी करून त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर बोलावण्याचा अधिकार केंद्राकडे आहे. तृणमूलने केंद्राकडे बोट दाखवण्यापूर्वी नियमांकडे लक्ष द्यावे, अशा शब्दात शहांनी ममतांवर निशाणा साधला.