पुणे : बहुजननामा ऑनलाईन – तोट्याच्या आणि प्रवासी नसलेल्या मार्गांमुळे एसटी महामंडळाला नेहमी आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे चार ते पाच प्रवासी असतानाही त्या बसला दहा ते पंधरा किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे इंधनावरील खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची आवडती एसटी आता बंद होणार आहे.
प्रशासनाने राज्यभरातील तब्बल साडेअकराशे मार्गांची यादी प्रकाशित केली असून परिणामी, या मार्गावरील तोट्याच्या गावांपर्यंत बस न नेण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. सध्या अनेक गावांमधील प्रवाशांकडे दुचाकी आणि चारचाकी वाहने आल्याने एसटीच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. त्यातूनच ज्या गावामध्ये दहा ते बारा किलोमीटरचा वळसा घालून बसेसला जावे लागत आहे. त्या मार्गावर या बसेसला जेमतेम चार ते पाच प्रवासी मिळत आहेत.
कमी झालेल्या प्रवासी संख्येमुळे महामंडळाच्या इंधनाचाही खर्च निघत नाही. त्यामुळे महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्याची गंभीर दखल घेऊन महामंडळाने अशा मार्गांची यादी तयार करण्याच्या सूचना सर्व विभागांना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यभरात असे तब्बल साडेअकराशे मार्ग असल्याचे या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा मार्गांमध्ये कपात करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांनी दिली.