नागपूर : Bombay High Court | आरोपी आणि संबंधित मुलीची मैत्री होती. पण आरोपी तिच्यावर एकतर्फी प्रेम (One Sided Love) करत होता. एकदा त्याने तिच्याकडे स्वत:च्या भावना व्यक्त केल्या. पण मुलीने बोलणे बंद केल्यावर आरोपीने वाटेत अडवून तिचा हात पकडला आणि बोलत का नाहीस, असे विचारले होते. या प्रकरणी विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकरण कोर्टात (Bombay High Court) गेले. नागपुर खंडपीठाने (Nagpur Bench) या प्रकरणी निकाल देताना, लैंगिक हेतूशिवाय मुलीचा हात पकडल्यास विनयभंग होत नाही, असे स्पष्ट करत आरोपीची निर्दोष सुटका केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे (Justice Anil Pansare)
यांनी हा निर्णय दिला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, वर्धा जिल्ह्यातील दहेगाव येथील आरोपी आर्यन ऊर्फ रवींद्र तोडकर
(२९) याची एका मुलीसोबत मैत्री होती. ते दोघेजण मोबाइलवरून रोज बोलायचे. आर्यनचे त्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते.
एक दिवस आर्यनने तिच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. यावर तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही.
१७ नोव्हेंबर २०१५ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास आर्यनने मुलीला रोडवर अडवून तिचा हात पकडला आणि जवळ ओढून म्हणाला, तू माझ्यासोबत का बोलत नाही, तू मला आवडते, माझे तुझ्यावर प्रेम आहे. यावेळी त्याने मुलीच्या शरीराला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला नाही. लैंगिक भावनेसंदर्भात काहीही बोलला नाही.
उच्च न्यायालयाने हे सर्व मुद्दे विचारात घेत आरोपीची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आक्षेपार्ह आहे. पण त्याला विनयभंग व इतर संबंधित गुन्ह्याअंतर्गत दोषी ठरविले जाऊ शकत नाही, असे म्हटले.
तत्पूर्वी, २५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला एक वर्षाचा सश्रम कारावास
आणि ५ हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली होती. आरोपीने वरच्या कोर्टात अपील केल्यानंतर ५ ऑगस्ट २०२३
रोजी सत्र न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला. यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला.
उच्च न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांवरून कोणतेही गुन्हे सिद्ध होत नसल्याचे म्हणत आरोपीची निर्दोष सुटका केली.