मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- सध्या आपल्या आवाजाने प्रसिद्ध असलेली रानू मंडल सर्वांना माहीत आहे. आपले पोट भरण्यासाठी ती जेव्हा स्टेशनवर गाणं गायची तेव्हा प्रत्येक जण तिच्या आवाजाची तुलना लता मंगेशकरांच्या आवाजासोबत करत होता. आपल्या याच आवाजाच्या जोरावर आता रानू मंडल स्टार झाली आहे. हिमेश रेशमियाने तर तिला प्लेबॅक सिंगर म्हणून बॉलिवूडमध्ये लाँचही केलं आहे. रानूचा आवाज गाणकोकिळा लता मंगेशकर यांच्यापर्यंतही पोहोचला. यावर प्रतिक्रिया देताना लता मंगेशकर म्हणाल्या की, “नक्कल करू नको, ओरिजिनल रहा.” लता मंगेशकर यांची हीच प्रतिक्रिया लोकांना खटकली. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना खूप निगेटीव कमेंट येताना दिसत आहेत.
एका युजरने म्हटले की, “जेव्हा लता मंगेशकर आपल्या चांगल्या दिवसांचा अनुभव घेत होत्या तेव्हा त्यांनी अनेक नवीन फीमेल सिंगर्सचं करिअर बरबाद केलं आहे. त्या कसं कोणाला चांगलं म्हणू शकतात.” आणखी एकाने लिहिले की, “मी रानू मंडलबद्दल तुम्ही दिलेल्या टीकात्मक आणि निंदा करणाऱ्या प्रतिक्रियेवर आदरपूर्वक सहमत नाहीये. तुम्ही तुमच्या वक्तव्यावर थोडा विचार करायला हवा आणि रानू मंडलला सपोर्ट करायला हवं. रानूकडे गमावण्यासाठी काहीच नाही.अशात तुमच्या कमेंटची कोणालाच पर्वा नाही. कठोर बोलल्याबद्दल माफ करा.”
काय म्हणाल्या लता मंगेशकर ?
एका मुलाखतीत बोलताना रानू मंडलवर प्रतिक्रिया देताना लता मंगेशकर म्हणाल्या की, “जर माझ्या नावाने किंवा कामाने कोणाचं चांगलं होत असेल तर मी स्वत:ला भाग्यवान समजते. मला याचीही जाणीव आहे की, नक्कल करून तुम्हाला दीर्घकाळापर्यंत यश मिळू शकत नाही.” रानूला सल्ला देत लता मंगेशकर म्हणाल्या की, “ओरिजिनल रहा, सर्व गायकांचे एव्हरग्रीन गाणी गा परंतु काही काळानंतर गायकाला आपला आवाज शोधायला हवा.”