मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही महिन्यात कोरोनामुळे रक्तदान शिबिरं न झाल्याने पुढील ७ ते ८ दिवस रक्तसाठा पुरु शकणार आहे. आणि ही बाब अत्यंत काळजीची आहे. ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ असं आपण म्हणत असतो. या वाक्याला प्रेरीत होऊन आपण रक्तदानही करत असतो. मात्र, गेल्या काही महिन्यापासून राज्यात रक्तदान शिबिरांमध्ये कमालीची घट झाली असून त्याचा परिणाम आता राज्यावर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. राज्यात सात ते आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती ट्वीट करत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचं आवाहन आव्हाडांनी केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेक महाविद्यालये आणि एनजीओ बंद होत्या. त्यामुळं रक्तसाठ्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. तर सध्या आता सात ते आठ दिवसच पुरेल एवढाच रक्तसाठा राज्यात उपलब्ध आहे. त्यामुळे आव्हाडांनी तरुणांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचे संक्रमण होण्यापूर्वी दोन ते अडीच हजार रक्तदान शिबीरं दर महिन्याला आयोजित होत होती. मात्र कोरोनामध्ये शिबीरांमध्ये घट झाली आहेत. या कालावधीत ५० टक्के रक्तदानात घट झालेली आहे. पूर्वी ५० टक्के सामान्य नागरिक रक्तदान करायचे तर १५ टक्के कॉलेज व ३५ टक्के कॉर्पोरेट मधून रक्तदान शिबिरातून रक्त उपल्बध व्हायचे. मात्र कोरोनामुळे गेल्या काही महिन्यात ते मिळाले नाही.
राज्यात काल तब्बल ४३ हजार १८३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली असून लॉकडाऊनच्या छाया गडद होताना दिसत आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. तर काही शहरांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आलेत. मात्र, तरीही राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा वेग थांबायचं नाव घेताना दिसत नाही.