अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. आता 1 मे पासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने लसीकरण मोहीम हाती घ्यावी असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी राज्य सरकारने टेंडर, किंमत, कोटा वगैरे घोळ घालत न बसता 1 मे पासून 18 वर्षावरील प्रत्येकाला तातडीने लसीकरण सुरु करावे. अन्यथा 1 मे नंतर या वयोगटातील प्रत्येक मृत्यूला राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशारा सुजय विखे यांनी दिला आहे.
डॉ. सुजय विखे म्हणाले, 1 मे पासून केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांना लस घेण्याची परवानगी दिली आहे. सध्या आपल्याकडे असलेल्या दोन्ही लस आपल्या देशाच्या आहेत. निर्णय घेण्यास आपण सक्षम आहोत. त्याचे परिणामही आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे ग्लोबल टेंडर आणि इतर प्रक्रियेत वेळ न घालवता राज्य सरकारने तातडीने लसीकरण मोहीम हाती घ्यावी. 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करत आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात झाली असल्याचे, सुजय विखे यांनी सांगितले.
तर राज्य सरकार कर्च का करु शकत नाही ?
देशात आजपर्यंत 14 कोटी लोकांचे लसीकरण झाले असून याचा खर्च केंद्र सरकारने उचलला आहे. असे असताना आपल्या महाराष्ट्रात नव्या पिढीच्या लसीकरणासाठीचा खर्च राज्य सरकार का करु शकत नाही ? असा सवाल करताना विखे म्हणाले, राज्य सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की, टेंडर आणि इतर प्रक्रियेत वेळ दडवण्यापेक्षा 1 मेपासून थेट लसीकरणाला सुरुवात करावी. टेंडर प्रक्रिया होत राहील, पण त्यासाठी लसीकरणाला विलंब होता कामा नये.
तरुणाईसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी
लसीकरणाच्या गोंधळात जर या वयोगटातील मृत्यू झाले तर ते महाराष्ट्राला मागे घेऊन जाणारे ठरतील. त्यामुळे आम्ही हात जोडून विनंती करतो की, 1 मेपासून या तरुणाईसाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम सुरु करावी. केंद्राकडून आलेला लस साठा, राज्याचा लस साठा वेगळा ठेवावा. यासाठी जी काही यंत्रणा राबवायची त्याची या दोन-चार दिवसांत तयारी करावी. आता वेळ कमी आहे, असेही सुजय विखे यांनी म्हटले.
प्रत्येक मृत्यू वाचले पाहिजेत
सुजय विखे पुढे म्हणाले, प्रत्येक मृत्यू वाचवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने नियोजन केले पाहिजे. या प्रक्रियेला उशीर झाला तर एक मे नंतर 18-45 वयोगटातील प्रत्येक मृत्यूला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार असेल, हे मी मुद्दाम सांगत आहे, असे म्हणत सुजय विखे यांनी राज्यातील ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.