सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्याने गुरुवारी (दि. 11) पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा व एमपीएससीचा तीव्र निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आता ही परीक्षा 21 मार्च रोजी होणार आहे. दरम्यान यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे राज्यातील जनतेला नुसता त्रास झाला आहे, अशी टीका राणे यांनी केली आहे.
राणे म्हणाले की, एमपीएससीला परीक्षा पुढे ढकलायची होती, तर मग हॉलतिकिटे का काढली? विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान सरकार भरून देणार आहे का, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. सरकारने याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे. जेंव्हा भ्रष्टाचार करायचा असतो. टेंडर पास करायचे असते, त्यावेळी सरकारमधील लोकांचा ताळमेळ चांगला असतो असा टोलाही त्यांनी लगावला आहे. अँटिलियाच्या बाहेर नेमके काय झाले, हे आपल्याला खरेच जाणून घ्यायचे असेल, तर सचिन वाझेंची चौकशी झाली पाहिजे. त्यांना अटक झालीच पाहिजे. सदर प्रकरण अतिरेकी आहे की, खंडणीचे आहे, हे बाहेर यावे लागेल,असेही त्यांनी म्हटले आहे.