बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील सत्ताधारी सरकारच्या येत्या काही दिवसात 3 विकेट पडणार आहेत असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार आहेत. तर परिवहन मंत्री अनिल परब देखील म्हाडा जमीनी प्ररकरणी घरी बसणार आहेत असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
भाजप प्रवक्ते किरीट सोमय्या या प्रकरणी बोलताना सांगितलं की, अनंत करमुसे मारहाण प्रकरणी त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. अनंत करमुसे माराहण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना कधी जेलमध्ये टाकणार असा सवाल केला. त्यांना अटक का होत नाही असाही प्रश्न सोमय्या यांनी केला. आमदार निरंजन डावखरे, भाजप नगरसेवक मनोहर डुंबरे हे देखील यावेळी उपस्थित होते.
TRP प्रकरणांचा मुंबई पोलिसांनी नुकताच भांडाफोड केला. टीआरपी प्रकरणात ठाकरे सरकार आणि गृहमंत्री अनिल देशमुख त्या चॅनेल वाल्यांना का घाबरत आहेत असा सवाल देखील सोमय्या यांनी केला आहे.
विरोधी पक्ष म्हणून आम्ही कोविडमध्ये पूर्ण जबाबदारीनं काम करत आहोत. कोविडमध्ये किती जण मृत्यूमुखी पडले आहेत. हे सरकार त्यांच्या पापानं पडणार असा खोचक टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर एसआरए प्रकरणात खोटे बोलत आहेत. याबाबत पुढे आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत असंही सोमय्या यांनी सांगितलं.