मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – बिहार निवडणुकीतील विजयामुळे सध्या राज्यातील भाजपचा उत्साह वाढला आहे. अनेक भाजप नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच बिहार निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस असल्याने या विजयाचे महाराष्ट्र भाजपसाठी विशेष महत्त्वाचे आहे. भाजप आमदार नीतेश राणे यांनी तर बिहारनंतर आता महाराष्ट्रातही भाजपचे सरकार येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. आता स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असली तरी त्यांनी महाराष्ट्रातील सत्तेसंदर्भात वेगळी भूमिका मांडली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी बिहारच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, आम्ही राज्यातल्या सत्तांतराकडे लक्ष ठेवून काम करत नाही. राज्यातील सरकार एखाद्या दिवशी स्वत:च्याच ओझ्याने कोसळेल. कारण अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ज्या दिवशी हे सरकार कोसळेल, त्या दिवशी आम्ही पर्यायी सरकार देऊ.
ते म्हणाले, प्रत्येक निवडणूक वेगळी असते, ती काहीतरी शिकवते. बिहारमधील मतदार अतिशय प्रगल्भ आहेत. कारण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आहे. कोरोना संकट काळात काही सरकारं केवळ टीका करत होती. त्यावेळी मोदींनी विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला होता.
भाजपचे आमदार जास्त आले तरी नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रिपद दिले जाईल, असे भाजपने बिहार निवडणुकीपूर्वीच जाहीर केले होते. परंतु आता भाजपच्या जागा जास्त आल्यानंतर मुख्यमंत्रिपद भाजपला मिळावे अशी मागणी होऊ लागली आहे, यावर फडणवीस म्हणाले, आम्ही दिलेला शब्द पाळतो. नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, हे पंतप्रधान मोदींपासून अनेक नेत्यांनी सांगितलं आहे. तसा शब्दच आम्ही त्यांना दिलेला आहे. तो शब्द आम्ही पाळणारच.