बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते अनेकवेळा मला चंपा, तर देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या संबोधतात. पण असे म्हणू नये, आम्ही देखील मर्यादा पाळतो. आम्ही त्या पध्दतीने बोलू शकतो, उद्धव ठाकरे ना उठा म्हणायचे का, जयंत पाटील यांना जपा म्हणायचे का? शरद पवार यांना शपा म्हणायचे का? पण आमची ती संस्कृती नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली.
13 महिन्यांपूर्वी निवडणुकी पूर्वी असलेली युती स्वाभाविकपणे अस्तित्वात यायला हवी होती. परंतु ज्यांना नाकारले होते तेच पुन्हा सत्तेत आले आहेत. अकृत्रिमपणे निर्माण झालेल्या सरकारची वर्षपूर्ती झाली आहे. वर्षभरात खुर्चीसाठी वाटेल तो अपमान सहन करणे, पण भाजप सत्तेत येईल या भीतीने पुन्हा एकत्र येणे असे प्रकार घडले आहेत. हे संपूर्णपणे गोंधळलेले सरकार आहे. या वर्षभरात अनेक भ्रष्टाचार झाले. कोरोनातही भ्रष्टाचार झाले. प्रत्येक भ्रष्टाचार बाहेर येईल. त्यांचे वाभाडे निघतील म्हणून हे सरकार अधिवेशन घाययला घाबरत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी अधिवेशन घेऊन दाखवावे असे ते म्हणाले.
सध्या शिक्षण क्षेत्राची अवस्था वाईट झाली आहे. या सरकारच्या काळात सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळाली नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही. या सरकारने मराठा आरक्षणाचे मातेरे करून टाकले. फडणवीस यांनी अतिशय कष्टाने आरक्षण मिळून दिले होते. पण या सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही. शिक्षणातले आरक्षण यांनी आता रद्द केल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.