मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेवरुन संसदेतही गदारोळ करत भाजपासह इतर काही पक्षाच्या खासदारांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी झाली. तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही देशमुख यांच्या राजीनाम्यासह चौकशीची मागणी केली आहे. तसेच वाझेंना वाचविण्यासाठी ठाकरे सरकारने तब्बल 9 वेळा विधानसभा स्थगित केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वसुली करण्यासाठीच निलंबित केलेल्या सचिन वाझेंना पुन्हा पोलीस सेवेत घेतले होते. परमबीर सिंग यांनी देशमुखांच्या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शरद पवार यांना सुद्धा दिली होती. त्यासंदर्भात त्यांनी काय केले? असा सवाल करत मागील एक वर्षांपासून हा तमाशा सुरू असून वाझेंना वाचविण्यासाठी सरकारने 9 वेळा विधानसभा स्थगित केल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबई पोलीस दलात बदल्यांचे रॅकेट उघडकीस येऊन त्याचे सर्व पुरावे गुप्तचर विभागाने सादर करुनही मुख्यमंत्र्यांनी त्यावर काहीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे फोन टॅपिंगचे आणि इतर सर्व सबळ पुरावे घेऊन आज दिल्लीला केंद्रीय गृहसचिवांना भेटून याबाबतची सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचे फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले आहे.