मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करुन ‘महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक छिद्रे पडली आहेत. अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय’ अशा शब्दात निशाणा साधला आहे. तसेच या तीन पक्षांनी अनैसर्गिक सरकार बनवून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला असल्याची घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटले फेसबुक पोस्टमध्ये
महाराष्ट्रात विकास होईल अशी वेडी आशा भोळी बाभडी जनता करत आहे, परंतु विकास करण्याची जबाबदारी ज्या मंत्र्याकडे आहे ते मंत्री कोणत्या ना कोणत्या तरी घोटाळ्यात व कारनाम्यात फसले आहेत. पुण्यात पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर ठाकरे सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्र्याचे नाव सध्या झळकत आहे. मंत्र्यांचे तरुणीसोबत अनैतिक प्रेम संबंध होते आणि त्यांनी विश्वासघात केल्यामुळे तरुणीने आत्महत्या केली अशी माहिती प्रसिद्धी माध्यमांवर येत आहे.
महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय…https://t.co/uDTqUzj67U pic.twitter.com/SlpzqLenRh
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 14, 2021
चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच एका कथित प्रेयसीने बलात्काराचे आरोप केले आणि त्यांनीच स्वत: आपले अनैतिक संबंध आणि मुलं असल्याच्या भानगडीची कबुली दिली. संपूर्ण राज्यात या मुद्यावर निदर्शने झाली तरीही त्या भानगडीबाज मंत्र्यांनी अद्यापही राजीनामा दिला नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांच्या जावयाला ईडीने ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. तर एका कॅबिनिेट मंत्र्यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आणखी एका कॅबिनेट मंत्र्यावर निशाणा साधताना म्हटले की, एका मुजोर कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्या विरोधात एक फेसबुक पोस्ट सहन न झाल्यामुळे एका इंजिनिअर युवकाला बेदम मारहाण केली होती आणि स्वत: ते मंत्री मारहणीच्यावेळी उपस्थित होते.
ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री त्यांच्या मतदारसंघात सतत हिंदू कुटुंबांना पळवून लावले जात आहे आणि हिंदूंचा सर्वेसर्वा म्हणवणाऱ्या शिवसेनेने सत्तेसाठी तोंडावर लाचारीची पट्टी लावली आहे. ठाकरे सरकार प्रत्येक टप्प्यात अपयशी झाले आहे. छुप्या दरवाजाने घुसलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने अनैसर्गिक सरकार बनवून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.