बहुजननामा ऑनलाइन टीम – स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty-Sadabhau Khot )यांनी कडकडनाथ कुक्कुटपालन घोटाळ्यातील पैसे वसुलीला झारीतील शुक्राचार्य आड येत असल्याचे सांगत रयत क्रांती संघटनेसोबत आपला संघर्ष कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांना देखील हा इशारा दिल्याचे म्हटले जाते.
२०१९ च्या लोकसभेत शिवसेनेने भाजपसोबत लढत शेट्टी यांचा पराभव केला. मात्र, विधानसभेनंतर राजकीय गणिते बदलल्याने शिवसेनेने भाजपसोबत फारकत घेतली. तथापि, राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्रात असलेला अभेद्य बालेकिल्ला भेदण्याचे भाजपचे प्रयत्न तोकडेच राहिले, पण हातातोंडाला आलेला सत्तेचा घासही महाविकास आघाडीच्या ताटात गेला. मात्र, सोडून गेलेल्या सहकारी मित्रांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्याच मित्रांचे मोहरे कामी आणण्याची भाजपची रणनीती अजूनही कायम आहे.
त्याच रणनीतीच्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना पुढे करुन भाजपने कृषी विधेयकाच्या सन्मानार्थ आत्मनिर्भर यात्रा आयोजित केली. यात्रेचा शुभारंभ हा सांगली जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील यांचे गाव असलेल्या येडे मछिंद्र येथून केला व सांगता इस्लामपूरच्या यमा चौकात केली गेली. या दोन्ही वेळी भाजपचे नेते उपस्थित होते. यात्रेचा उद्देश कृषी कायद्याचे समर्थन असले तरी हेतू हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शेट्टी विरोध हाच होता. कारण चार दिवसांच्या यात्रेचा मार्ग इचलकरंजी, पन्हाळा, कोकरुड आणि इस्लामपूर असा होता. यात्रेदरम्यान शेट्टी यांना लक्ष करण्याचा प्रयत्न भाजपने पर्यायाने आमदार खोत यांनी केला.
कुरघोडीची खेळी
कडकडनाथ कुकुटपालन हा करार शेतीचा एक भाग असल्याने नव्या कृषी कायद्यात तरतूद केला गेलेला करार शेतीचा गैरफायदा कशा रीतीने घेतो याचे कडकडनाथ उदाहरण असल्याचे सांगत या प्रकरणी पैसे वसूल करण्यास जे झारीतील शुक्राचार्य आहेत त्यांना उघडे पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.
दरम्यान, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्यांसोबत कर्नाटकातील काही शेतकऱ्यांचे सुमारे साडेपाचशे कोटी रुपये कडकनाथ घोटाळ्यात अडकले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी, सत्ताबदल झाल्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाही. पालकमंत्री जयंत पाटील असून सुद्धा या घोटाळ्याचा तपास पुढे जात नाही. मात्र, जयंत पाटील विरोधक असलेले नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाही. प्रकाश मेडिकल कॉलेजला अर्थसहाय्य करणाऱ्या मुंबै बँकेची चौकशी होते. दुसरीकडे कडकनाथचा तपास का रखडला याचे उत्तर मिळत नाही.