सातारा : बहुजननामा ऑनलाईन – देशातील सर्वोच्च न्यायालय, सीबीआय, रिझर्व्ह बॅंक अशा स्वायत्त संस्थांवर आक्रमण करण्याचे काम भाजपने सुरु केले असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी केली. दरम्यान, देशातील लोकशाही जर टिकवायची असेल तर जनतेने पुरोगामी पक्षाच्या उमेदवारांना निवडून दयावे असे आवाहन कोकाटे यांनी केले. संभाजी ब्रिगेड साताऱ्यात खा.उदयनराजे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभी राहणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.
पुढे बोलताना कोकाटे म्हणाले, भाजप राजकीय पक्ष नसून एक संप्रदाय आहे. त्यांच्याकडून देशात अघोषित आणीबाणी आणण्याचे काम सुरू आहे, असे मत माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी व्यक्त केले असल्याचा दाखला देवून कोकाटे म्हणाले, आपल्या देशात ग्रामसेवकाच्या देखील बदलीचा आदेश व्हॉटस ऍपवर दिला जात नाही. मात्र, या सरकारने स्वायत्त संस्था असलेल्या सीबीआयच्या संचालकाच्या बदलीचा आदेश मध्यरात्री व्हॉटस ऍपव्दारे पाठविण्यात आला. त्याचबरोबर करण्यात आलेल्या नोटाबंदीमुळे छोट्या व्यावसायिकांचे कसे नुकसान झाले आणि देशाचा विकासदर कमी झाला, याबाबतचे मत खुद्द रिझर्व्ह बॅंकेचे मुख्याधिकारी रघुराम राजन आणि उर्जित पटेल यांनी व्यक्त केले आहे.
गुजरात फाईल्स नावाच्या पुस्तकाच्या माध्यमातून मोदी व अमित शहा यांनी घडवून आणलेल्या एन्काऊंटरची माहिती देखील समोर आली आहे. त्याचबरोबर अमित शहा यांना तडीपार देखील करण्यात आले होते. शहा यांचा खटला ज्या न्यायालयात सुरू होता त्या न्यायालयाचे न्यायमूर्ती लोया यांचा घातपात झाला. तसेच दिल्लीमध्ये संविधान जाळण्याची घटना घडली मात्र, अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. अशीच परिस्थिती राहिली आणि जनता गप्प राहिली तर देशात हुकुमशाही येणार आहे आणि ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्याग केला तो देखील वाया जाईल, अशी खंत कोकोटे यांनी व्यक्त केली.