नवी दिल्ली : – बिहार विधानसभा निवडणुकीबरोबरच देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये झालेल्या पोट निवडणुकींमध्येही भाजपला मोठे यश मिळाले आहे. देशातल्या सगळ्याच राज्यांमध्ये भाजपचा झेंडा लोकांनीच फडकविला आहे. आम्ही फक्त 2 होतो आता त्याचा देशभर विस्तार झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच बिहारचा विकास होईल असे सांगत पंतप्रधानांनी सर्वच चर्चेला पूर्णविराम दिला. काही पक्ष हे फक्त कुटुंबांपुरतेच मर्यादीत आहेत अशी टीकाही त्यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांची नावे न घेता केली. तरुणांनी भाजपसोबत येत देशाच्या विकासात सहभागी व्हावे असेही ते म्हणाले.
बिहारमधील यशानंतर भाजपने (Bihar Assembly Election result) बुधवारी दिल्लीतल्या मुख्यालयात मोठा जल्लोष केला. यावेळी पंतप्रधान मोदी अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेते या वेळी उपस्थित होते. देशाच्या विकासासाठी जे प्रामाणिकपणे काम करतील त्यांनाच लोक निवडून देतील. आता विकास हाच मुद्दा यापुढे राहिल हाच या निकालांचा अर्थ आहे असे मोदी म्हणाले, जे विकासापासून दूर जातील त्यांचं लोकांनी डिपॉझिट जप्त केले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. देशातल्या सगळ्यांचा भरवसा हा आता फक्त भाजपवरच आहे असे ते म्हणाले.
कोरोनाच्या काळात निवडणूक घेणे हे आव्हान होते. मात्र ते सगळ्यांनी यशस्वी पार पाडले आहे. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद असेही पंतप्रधान म्हणाले. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. बिहार विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर NDAला बहुमत मिळाले आहे. NDAने बहुमताक्षाही जास्त 125 जागा जिंकल्या. तर महाआघाडीने 110 जागा जिंकल्या आहेत.
भाजपला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी नितीश कुमारच हेच मुख्यमंत्री असतील असे भाजपने जाहीर केले आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) हे आता सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. बिहारमध्ये RJD बाजूला करत मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या नितीश कुमार यांनी सत्ता हातातून जाऊ दिली नाही. 2005 मध्ये बहुमत घेऊन नितीश पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी सतत आपली पकड कायम ठेवली आहे.