नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी काल अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणा केल्या. गोयल यांनी अर्थसंकल्पातून केलेल्या घोषणांमुळे आता बँकांमध्ये मोठी नोकरभरती होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
मोदी सरकारनं रोजगार वाढवण्यासाठी आणखी आठ बँकांना आर्थिक निर्बंधातून (प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन) बाहेर काढण्याचे सूतोवाच केले आहेत. आता आणखी काही बँकांना आम्ही आर्थिक निर्बंधातून बाहेर काढणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं आहे. याबाबत पीयूष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या निर्णयामुळे या बँका स्वतःच्या शाखा वाढवू शकणार आहेत. बँकांनी शाखा वाढवल्यास बंपर नोकरभरती करण्यात येणार असून, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.
आरबीआयनं बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे आर्थिक निर्बंध हटवले आहेत. अकरा सरकारी बँकांना आरबीआयनं आर्थिक निर्बंधामध्ये ठेवलं होतं.आर्थिक निर्बंधामध्ये असलेल्या बँकांची परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत या बँका कोणतंही मोठं कर्ज देऊ शकत नाहीत. या बँकांना आर्थिक निर्बंधातून बाहेर काढल्यानं ग्राहकांवर कोणताही सरळ परिणाम होणार नाही. परंतु या बँकांना स्वतःच्या शाखा वाढवण्यास मदत मिळणार आहे. तसेच या बँका नव्या निर्माण करण्यात येणाऱ्या शाखेतील कर्मचाऱ्यांसाठी नव्या भरती करतील. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.