मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय कलहाला सुरवात झाली आहे. भाजप बरोबर सत्तेत असलेले पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस सरकार (२००९-२०१४ )पाच वर्षे सत्तेत होते तेव्हा नाशिकच्या टर्मिनल मार्केटबाबत ते झोपा काढत होते का, असा सवाल पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना केला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते भुजबळ यांनी विरोधकांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही विधानसभा, विधान परिषदेत या विषयावर वेगवेगळी उत्तरे दिली तेव्हा झोपा काढत होते का, असा प्रतिसवाल केला.
२००९ मध्ये नाशिक तालुक्यातील पिंप्री सय्यद येथे टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी कृषी पणन महामंडळास १०० एकर जागा देण्यास नगरविकास विभागाने अनुमतीही दिली. तसे उत्तरही भाजप सरकारने २०१७ मध्ये विधान परिषदेत दिले होते. असे असताना आता नगरविकास विभागाशी चर्चा करावी लागेल, विभागीय आयुक्तांचा अहवाल मागवू अशी उडवाउडवीची उत्तरे राज्यमंत्री देत असल्याची टीका भुजबळ यांनी केली. या उत्तराने समाधान न झाल्याने भुजबळ यांनी हा प्रश्न राखून ठेवण्याची मागणी केली.