बहुजननामा ऑनलाईन – “भारतीय जनता पक्षातील नेत्याच्या निधनाला विरोधी पक्ष जबाबदार आहेत. ते भाजपच्या पक्ष नेत्यांवर मारक शक्तींचा प्रयोग करत आहेत.” असा खळबबळजनक आरोप भोपाळच्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी केला आहे. माजी अर्थमंत्री अरुण जेटली, मध्यप्रदेशचे माजी मुख्यंत्री बाबूलाल गौर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भोपाळमधील भाजपच्या कार्यालयात श्रद्धांजली सभा आय़ोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी शोक व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, निवडणूकांवेळी एक संन्याशी मला भेटला होता. त्यांने सांगितले होते की, वेळ खूप खराब आहे. तुमची साधना वाढवा, विरोधी पक्ष मारक शक्तीचा प्रयोग तुमच्या पक्षावर आणि नेत्यांवर करत आहे. त्यामुळे सावधान राहा.” त्यांनी सांगितलेल्या या गोष्टींचा मला विसर पडला होता. आता मात्र आपल्या पक्षाचे नेते एकापाठोपाठ एक आपल्याला सोडून जात आहेत. त्यामुळे महाराजांनी सांगितलेलं खरं आहे का ? असं मला वाटायला लागलं आहे, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला आहे.
दरम्यान, मागील एक वर्षात काही मोठ्या नेत्यांचे निधनही झाले आहे. मागील वर्षी १६ ऑगस्ट ला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. तर यावर्षी वरीष्ठ नेता अनंत कुमार, मनोहर पर्रिकर, सुषमा स्वराज, बाबूलाल गौर आणि आता अरुण जेटली यांचे निधन झाले.