नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे युवा खासदार तेजस्वी सूर्या यांनी सतर्कतेचा इशारा देत दिल्ली येथील शाहीन बाग येथे चालू असलेल्या आंदोलनावर टीका केली आहे. शाहीन बाग इथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. बहुसंख्य समुदायाने सतर्क राहावे. अन्यथा देशात पुन्हा मुघल शासन परतण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ते आपल्या तडफदार भाषणासाठी ओळखले जात असून ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव चर्चेत बोलत होते.
तसेच बहुसंख्य समुदाय सतर्क राहिला नाही तर मुघल राज्य दूर नाही, असे म्हणत शाहीन बाग आंदोलनावर त्यांनी निशाणा साधला. त्यांनी असे वक्तव्य केल्यानंतर सभागृहात गोंधळच उडाला. इतकेच नाही तर गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभारही मानले.
‘जुन्या जखमा भरुन काढल्याशिवाय न्यू इंडियाची निर्मिती होऊ शकत नाही. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील पीडितांना नागरिकत्व देण्यासाठी सीएए आहे. कुणाचंही नागरिकत्व काढण्यासाठी हा कायदा नाही. हा कायदा कुणाचंही नागरिकत्व काढून घेणार नाही. भारतीयांशी सीएएचं काहीही देणंघेणं नाही हे विरोधकांनाही माहित आहे. पण जाणिवपूर्वक विरोध केला जात आहे, जे दुर्दैवी आहे,’ असे तेजस्वी सूर्या यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
शेजारच्या मुस्लीम बहुसंख्य देशात धार्मिक अत्याचाराला बळी ठरलेल्या लोकांना सीएएमुळे नागरिकत्व मिळेल. पण याला विरोध केला जात असून येणारी पिढी विरोध करणाऱ्यांना कधीही माफ करणार नाही. विरोधकांना मुद्दे संपू द्यायचे नाहीत, कारण ते मुद्दे व्होट बँकसाठी वापरता येतील, असेही सूर्या म्हणाले आहेत.