बहुजननामा ऑनलाइन टीम –
अवैध व बनावटी दारू विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दोन्ही जिल्ह्यात दारूबंदी मागे घेण्यात यावी असे पत्र पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठविले आहे.
दारुबंदी असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठया प्रमाणात बनावट दारू विक्री केली जात आहे. या अवैध दारु विक्रीमुळे गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात सुध्या पाच वर्षांपूर्वी दारूबंदी लागू करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी लागू झाल्यानंतर या जिल्ह्यात सुध्दा दिवसरात्र अवैध दारू व बनावट दारू विक्री सुरू झाली.
या अवैध दारू विक्रीमध्ये तरुण मुले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समावेश असून या तरुण पिढीचे आयुष्य उध्वस्त होत आहे. दोन्ही जिल्ह्यात फक्त नावाचीच दारूबंदी असून दाम तिपटीने अवैध रित्या दिवसरात्र मोठ्या प्रमाणात खुलेआम दारूची विक्री होत आहे. यामुळे राज्याचा करोडो रुपयाचा महसूल सुध्दा बुडत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी सुरू ठेवावी की उठवावी याबाबत मत मागितले असता 80 टक्के लोकांनी दारू सुरू करावी असे मत व्यक्त केले आहे.