बहुजननामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधील(Balrampur) बलात्कार पीडितेचाही काल मृत्यू झाला. या 22 वर्षीय दलित महिलेवर दोन जणांनी बलात्कार केला होता आणि तिला गंभीर जखमीही केले होते. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Balrampur)मुलीवर बलात्कार करणार्यांनी तिचे पाय तोडले आणि पाठीलाही गंभीर दुखापत केल्याचा आरोप तिच्या आईने केला, मात्र पोलिसांनी त्याचा इन्कार केला.
महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलगी गेली होती. घरी परतत असताना तीन-चार जणांनी तिचे अपहरण केले. तिला त्यांच्या खोलीवर नेउन इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला घराबाहेर फेकण्यात आले. आरोपींनी तिचे पाय तोडले आणि पाठीलाही गंभीर दुखापत केली.
ती उभी राहू शकत नव्हती आणि बोलू शकतही नव्हती, असे पीडितेच्या आईने सांगितले. मंगळवारी सायंकाळी ही मुलगी गंभीर अवस्थेत घरी परतली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात हलविले, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला, असे बलरामपूरचे पोलीस अधीक्षक देव रंजन वर्मा यांनी सांगितले. पोलिसांनी शाहीद आणि साहील यांना अटक केली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात मुलीचे हात-पाय मोडले नसल्याचा उल्लेख नसल्याचे पोलिसांनी सांगितले.