रांची : वृत्तसंस्था – २००६ साली भाजपमधून बाहेर पडून झारखंड विकास मोर्चा स्थापन केलेल्या बाबुलाल मरांडी तब्बल १४ वर्षांनतर घरवापसी करणार आहेत. त्यांच्या झारखंड विकास मोर्चाचे भाजपत विलीनीकरण केले जाणार आहे. त्यासाठी येत्या १७ फेब्रुवारीला रांची येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे उपाध्यक्ष ओमप्रकाश माथूर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे भाजपची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
या निवडणुकीत मरांडी यांच्या पक्षाला केवळ पाच जागा मिळाल्या. तर भाजपाच्या १२ जागा कमी झाल्यानं त्यांना राज्यातली सत्ता गमवावी लागली. मात्र आता विलीनीकरण झाल्यास भाजपची शक्ती वाढणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. दरम्यान बाबुलाल मरांडी यांनी काल दिल्लीत भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. यावेळी ओमप्रकाश माथूरदेखील उपस्थित होते. या बैठकीत झारखंड विकास मोर्चाच्या भाजपामधल्या विलीनीकरणाचा दिवस निश्चित करण्यात आला. याआधी शनिवारी बाबुलाल मरांडी यांनी अमित शहांची भेट घेतली होती. झारखंड विकास मोर्चानं ११ फेब्रुवारीला केंद्रीय कार्यकारणीची बैठक बोलावली आहे. यामध्ये झारखंड विकास मोर्चानं विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला जाईल. यानंतर याबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली जाईल.
पक्षात केवळ विचारधाराच महत्वाची
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मरांडी यांना घरवापसीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री सी. पी. सिंह यांनी मरांडी यांच्या पक्ष प्रवेशाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ज्यांना भाजपाची विचारसरणी मान्य असेल, ते पक्षात सहभागी होऊ शकतात. भाजपामध्ये व्यक्तीवादाला स्थान नाही. पक्षात केवळ विचारधाराच महत्त्वाची आहे, असं सिंह म्हणाले.