सातारा : बहुजननामा ऑनलाईन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या शाळेतील घटत्या पटसंख्येची सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोणत्याही परिस्थिती शाळा बंद पडू देणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीच्या बांधकामाचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सातार्यातील सामाजिक न्याय भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना ना. बडोले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन शासनाने जाहीर केला.
त्याचबरोबर सातार्यातून प्राथमिक शिक्षणास सुरुवात केलेल्या छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ग्रंथालय व दुरुस्तीसाठी निधीदेखील जाहीर केला. मात्र, शाळेची वास्तू हेरिटेजमध्ये असल्याने दुरुस्तीसाठी कायदेशीर समस्या निर्माण झाली आहे. मात्र, शाळेची घटती पटसंख्या व कायमस्वरूपी मुख्याध्यापक नसणे, या बाबी निश्चित गंभीर आहेत. पटसंख्या वाढवण्याची जबाबदारी येथील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेची आहे.त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीत ही शाळा बंद पडू देणार नाही, असा विश्वास ना. बडोले यांनी व्यक्त केला.