चाकण/ पुणे : बहुजननामा ऑनलाईन – वाहनचालकांकडून पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चाकणमध्ये वाहतुकीचे नियमन करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (दि.30) घडली. ही घटना चाकण येथील तळेगाव -चाकण चौकात दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या गुन्ह्यातील आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने खराबवाडी येथून अटक केली आहे.
रविंद्र नामदेव करवंदे (वय-30) असे जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर रोहित बाबू साळवी (वय- 20 रा. रेल्वे स्टेशन समोर, कल्याण, ठाणे), हर्षदीप भारत कांबळे (वय – 22 रा. रूम नं 6, गणपती चाळ चाळ नं. 7, कल्याण, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जखमी रविंद्र करवंदे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असुन त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास चाकण वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस शिपाई करवंदे चाकण चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी कंटेनर मागे घेण्यावरुन करवंदे आणि आरोपी यांच्यामध्ये वाद झाला. याचा राग मनात धरून दोन्ही आरोपींनी करवंदे हे कर्तव्य बजावत असताना अचानक दुचाकीवरुन येऊन त्यांच्या डोक्यात पाठीमागून लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर दोघे लगेच घटनास्थळावरुन पळून गेले. अचानक झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले करवंदे हे काही क्षणात बेशुद्ध पडले. नागरिकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी गुन्हे शाखेला या घटनेबाबत सूचना देऊन आरोपींचा माग काढण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना चाकण पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या सुचनेवरुन गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, गिरीश चामले, पोलीस हेड कॉन्स्टेबल यदु आडारी, गंगाराम चव्हाण, पोलिस नाईक नाथ केकान, पोलिस कॉन्स्टेबल राज हणमंते, शशिकांत नांगरे, सागर जैनक, त्रिनयन बाळसराफ यांच्या पथकाने केली.