बहुजननामा ऑनलाइन टीम – ‘कर्ता’ हे पुस्तक वैयक्तिक काळाचा गोषवारा राहिला नसून स्वातंत्र्योत्तर काळातील विविध घडामोडींचा पुरावा बनला आहे. त्या काळात ज्या पद्धतीने ग्रामीण जीवन, न्यायदान पद्धती, शहरीकरणातील बदल या सर्वांचे महत्त्वाचे निरीक्षण असलेले पैलू ‘कर्ता’ या पुस्तकात आहे, असे मत जेष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ अॅड. मुकुंदराव राजाराम ननवरे यांनी लिहिलेल्या ‘ कर्ता’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी जेष्ठ विधिज्ञ अॅड. किरण कोठडिया, माजी विभागीय आयुक्त वसंतराव वैद्य , रमणिकलाल कोठडिया, श्रीमती मिनादेवी जगताप यांची उपस्थिती होती.
यमाजी मालकर पुढे म्हणाले, ‘लॉकडाऊनच्या काळात एकटेपणामुळे जी अस्वस्था वाटत होती. त्यातून ‘कर्ता’ पुस्तकाची निर्मिती झाली आहे. त्या पुस्तकात लिहिलेले प्रसंग, त्या प्रसंगातून त्यांचे व्यक्तिमत्व दिसून येत आहे. शेती, न्यायदान, पुणे शहरात कोणते बदल घडत होते, याचे बारकावे त्यांनी पुस्तकाद्वारे टिपले आहेत. सकारात्मक दृष्टिकोन, आरोग्याची काळजी, आनंदी व समाधानी स्वभाव, चांगले संबंध हे मुकुंदराव ननवरे यांच्यातील गुण पुस्तकातून दिसून आले.’ ननवरे यांनी कुटुंबाबाहेर जाऊन अधिक संघटित पद्धतीने वकिलीचे अनुभव आणि गावातील न्याय, अन्यायाच्या प्रसंगातून व्यापक होऊन समाजासाठी ‘कर्ता’ पुस्तकाचा दुसरा भाग लिहावा, अशी सूचना मालकर यांनी केली.
पुस्तक लिहिण्यामागील भूमिका अॅड. मुकुंदराव ननवरे यांनी विषद करताना म्हणाले कि,
‘सातत्याने पक्षकार, माणसांच्या गराड्यात राहण्याची सवय असताना लॉकडाउनमध्ये घरात एकटे बसणे अस्वस्थ करून गेले. त्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी ४२ वर्षातील वकिलीतील अनुभव, कुटुंब, गांव, पुणे शहर या सगळ्या घटना कागदावर लिहाण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून कर्ता हे पुस्तक समोर आले. हा वडिलांचा वारसा एवढा मोठा होता की वकिली व्यवसाय करून ही वडिलांचे नाव पुसू शकलो नाही,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी निवृत्त जिल्हा न्यायाधीश वसंतराव पाटील, अॅड.जगदीश धायतडक, अॅड.विवेक निरगुडकर तसेच अॅड.नागेश मराठे, अॅड.इंद्रजित गिल, रमणिकलाल कोठडिया, अॅड. दिलीप निकुडे ,तेजश्री लोंढे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मोहिनी ननवरे, अॅड. सूरज ननवरे यांनी स्वागत केले. श्रीराम वैद्य यांनी आभार मानले. अॅड. सूरज ननवरे, सुजय ननवरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.