बहुजननामा ऑनलाईन : मोदी सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर आता अफगाणिस्तानमधील तालिबानने प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पाकिस्तानकडून काश्मीर आणि अफगाणिस्तानच्या मुद्द्याला जी जोड दिली जात आहे त्याचा विरोध केला. तालिबानचा प्रवक्ता जबीहउल्लाह मुजाहिद याने यावेळी बोलताना म्हटले कि, काश्मीरच्या मुद्द्याला काही पक्षांकडून अफगाणिस्तानशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या संकटातून बाहेर येण्यास कोणतीही मदत होणार नसून त्यांचं अफगाणिस्तानचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्याचबरोबर अफगाणिस्तान अन्य देशांच्या प्रकरणांमध्ये पडू इच्छित नाही. वास्तविक, पाकिस्तानची नजर सध्या या गोष्टीवर आहे की जर अफगाणिस्तानात शांतता प्रक्रियेला चालना दिली तर काश्मीर प्रश्न सोडविण्यात अमेरिका मदत करू शकेल.
मागील काही वर्षांपासून तालिबान पाकिस्तानला आपला सरंक्षणकर्ता मानत आहे. पाकिस्तानने त्यांना त्यांच्या भूमीत वाढण्यासाठी त्याचबरोबर ट्रेनिंग कॅम्प लावण्यास देखील मदत केली. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देखील केली. दरम्यान, काबूलमधील पाकिस्तानच्या दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार काश्मीरवरील प्रकरणावरून अफगाणिस्तानमधील शांतता प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही. त्याचबरोबर भारताने हा एकतर्फी निर्णय घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकाराचे उल्लंघन केले आहे.