पंढरपूर : बहुजननामा ऑनलाइन – ४० लाख रुपयांची सुपारी घेऊन एकाच खून करण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी बंदूक, कोयता, कुऱ्हाड, लोखंडी नळी आदी धारदार शस्त्रे जप्त केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
याप्रकरणी बंडू घोडके ( रा. बोहाळी ता. पंढरपूर) हणमंत जाधव ( रा. बोहाळी ता. पंढरपूर) बंडू मासाळ (रा. धायटी ता. सांगोला) बापू गोडसे (रा. कौठाळी ता. पंढरपूर) या चौघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागनाथ शिवाजी घोडके (रा. बोहाळी ता. पंढरपूर) यांनी माझ्या जीवाला धोका असल्याची तक्रार उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्याकडे केली होती. त्यानुसार कदम यांनी पोलिसांना चौकशीच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे चंद्रभागा नदीवरील जुन्या दगडी पुलावर नाकाबंदी करुन तपासणी करताना पोलिसांना एका गाडीत ४ जण येताना दिसले. त्यांना थांबवून अधिक तपासणी करण्यात आली असता त्यांच्याकडे गावठी बंदूक, कोयता, कुऱ्हाड, लोखंडी नळी आदी धारदार शस्त्रे आढळले.
पोलिसांनी अधिक तपास केला असता नागेश घोडके यांचे बापू गोडसे व संतोष कोरके जमिनीवरुन वाद झाला होता. तोच राग मनात धरुन संतोष कोरके याने ४० लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले. फिर्याद मिळताच पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने खुनाचा प्लॅन फसलाच तसेच नागेश घोडके यांचा जीवही वाचला. दरम्यान, ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे राजेंद्र गाडेकर व त्यांच्या पथकाने केली.