बहुजननामा ऑनलाइन टीम – वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी (Anvay Naik Suicide Case) रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना (Republic TV Editor-in-Chief Arnab Goswami) रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून अटक केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रे, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केल्याचा आरोप रिपब्लिकने केला आहे. यावरून आता भाजपाने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. कारवाईवरून महाविकासआघाडी सरकारवर टीका होत आहे. कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करतील, असे गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांना सांगितले आहे.
तसेच त्यांनी तसे ट्विट देखील केलेले आहे. तसेच, ही केस बंद झाली होती. मात्र नाईक यांच्या पत्नीने केस पुन्हा सुरू करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर ही केस परत सुरू करण्याची परवानगी न्यायालयाने त्यांना दिली, असल्याचेही यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले.
5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरले होते. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.