नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेच्या तोंडावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी न्याय योजने’ची घोषणा केली होती आता पुन्हा मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्तेत आल्यानंतर वर्षभरात २२ लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत या नोकऱ्या देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटवरून ही घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी येत्या ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केलेलं ट्विट महत्त्वाचं मानलं जात आहे. ‘सध्या देशात विविध खात्यातील २२ लाख पदे रिक्त आहेत. आमची सत्ता आल्यास ३१ मार्च २०२० पर्यंत ही सर्वच्या सर्व २२ लाख पदे भरण्यात येतील,’ असं राहुल यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारकडून आरोग्य आणि शिक्षणासाठी निधी हस्तांतरीत केला जातो. त्याच्याशी ही सर्व रिक्तपदे लिंक करण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान लोकसभेच्या तोंडावर गांधींनी केलेल्या या घोषणेचा मतदारावर काही परिणाम होईल का यावर यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.