नवी दिल्ली : Amit Shah On Uddhav Thackeray | संसदेने मंजुरी दिल्यानंतर पाच वर्षांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर मोदी सरकारने (Modi Govt) वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू केला आहे. यानंतर देशभरातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सीएएवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांची दखल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली असून त्यांनी ठाकरे यांना आव्हान दिले आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
अमित शाह म्हणाले, मी उद्धव ठाकरेंना विचारु इच्छितो, तुम्हाला हा कायदा हवा की नको हे स्पष्ट करा. उद्धव ठाकरे हे सांगू इच्छितात की कायदा नको? देशाच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेपुढे हे मी आव्हान देतो की त्यांनी हे स्पष्ट करावे की हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन शरणार्थींना नागरिकत्व देणारा कायदा यायला नको. उद्धव ठाकरेंनी हे सांगितले आहे.
ते पुढे म्हणाले, राजकारण करु नका, मी थेट उद्धव ठाकरेंना विचारतो आहे की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याकांची मते हवी आहेत म्हणून ते राजकारण करत आहेत. आमची पहिल्या दिवसापासून ही भूमिका आहे की देशाची फाळणी झाल्यानंतर जे लोक भारतात शरणार्थी म्हणून आले आहेत त्यांना नागरिकत्व मिळाले पाहिजे.
अमित शाह म्हणाले, सीएए कायदा मागे घेतला जाणार नाही. सीएए कायद्यात विविध तरतुदी आहेत. सहाव्या सूचीत जी क्षेत्रे आहेत तिथे सीएए लागू होणार नाही. कुणी तिथून अर्ज केला तरीही तिथून ते स्वीकारले जाणार नाही. सीएए कायदा हा भारताचे नागरिकत्व देणारा कायदा आहे. कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्याचा हा कायदा नाही.
अमित शाह म्हणाले, केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांना कायदा नाकारण्याचा अधिकार नाही. कारण संसदेचा तो अधिकार आहे. हा विषय केंद्राचा आहे. केंद्र आणि राज्यांचा विषय नाही. दरम्यान, यावेळी शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर देखील टीका केली.