अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धरणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तांबे यांनी आपल्या पोलीस निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे अमरावती पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र, आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहीलेल्या चिठ्ठीत पत्नीची माफी मागितली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक तांबे यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार आज (रविवार) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आला. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यामध्ये त्यांनी वडील आणि पत्नीची माफी मागितली आहे. या घटनेची माहिती समजताच धरणी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
धरणी पोलिसांनी सांगितले की, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तांबे हे 25 जानेवारी पासून रजेवर होते. आज त्यांची पत्नी व वडील घरी आले असता त्यांना अतुल यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी या घटनेची माहिती तातडीने धरणी पोलिसांना दिली. मागील 12 दिवसांपासून तांबे हे पोलीस ठाण्यात आले नव्हते. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास धरणी पोलीस करीत आहेत.