चंद्रपूर :बहुजननामा ऑनलाईन – साहित्य क्षेत्रात कार्यरत जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर यांच्या वतीने प्रथमच ग्रामीण भागातील चिमूर क्रांतिभूमीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन येथील शेतकरी भवन सभागृहात १६ व १७ मार्च रोजी करण्यात आले आहे. संमेलनासाठी नांदेड, मलकापूर, भुसावळ, नागपूर व चिमूर येथून प्रस्ताव संस्थेकडे गेले होते. परंतु, चिमूर शहराची निवड करीत क्रांतिभूमीला आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचा मान देण्यात आला आहे.
ज्या क्रांतिभूमीने स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्या क्रांतिभूमीत पहिल्यांदाच संमेलनाच्या माध्यमातून साहित्य क्रांती होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची कर्मभूमी असलेल्या चिमूर क्रांतिभूमीत राष्ट्रसंतांनी आपल्या भजनाच्या माध्यमातून स्वातंत्र्यांसाठी बंड पुकारले होते. त्यामुळे या संमेलनस्थळाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात येणार आहे. या साहित्य सम्मेलनाचे स्वागताध्यक्ष साहित्य क्षेत्रात व न्यायाविधी क्षेत्रात कार्यरत ॲड. भूपेशकुमार पाटील राहणार असून, संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ . बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमूख दीपककुमार खोब्रागडे यांची निवड करण्यात आली आहे.
संमेलनाची सुरुवात संविधान व ग्रामगीतेच्या ग्रंथदिडीने होईल. त्यांनतर विविध विषयावर परिसंवाद, कविसंमेलन, कथाकथन, मान्यवरांची प्रगट मुलाखत, पथनाट्य, एकपात्री प्रयोग होणार असल्याने चिमूर क्रांतिभूमी साहित्यक्रांतीने फुलणार आहे. या साहित्य संमेलनात राज्यभरातून १६ तर जिल्ह्यातील पाचशेच्यावर साहित्यिक, कवी, नाटककार, अभिनेते येणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष ॲड. भूपेशकुमार पाटील, संमेलनाध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे, सुरेश डांगे, खेमराज भोयर, धनराज गेडाम, तिलक बांबोडे, प्रकाश मेश्राम, दलित डेकाटे, सदानंद लोखंडे, किशोर अंबादे, नथ्थु वाघमारे, संजय नागदेवते, जितेंद्र गाडगे व प्रकाश भगत यांनी दिली.