बहुजननामा ऑनलाईन टीम – राज्यातील राजकीय वातावरण निवडणुकांच्या घोषणेनंतर ढवळून निघाले आहे.आता सगळ्यांमध्ये ही उत्सुकता आहे की महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत कोण बाजी मारणार.तसेच सगळ्यांचे लक्ष आता विधानसभा निवडणुकांसोबतच होत असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकी कडेही लागले आहे. कारण या मतदारसंघातून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अवघ्या तीन महिन्यातच त्यांनी आपल्या या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिली. तर आता यानंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव पोटनिवडणुकीसाठी आघाडीवर आहे. यंदाची निवडणूक उदयनराजेंसाठी आव्हानात्मक समजली जात आहे. लोकसभा निवडणुकीत यंदा २०१४ च्या तुलनेत उद्यनराजेंचं मताधिक्य कमालीचं घटलं आहे. उद्यनराजेंची चांगलीच दमछाक शिवसेनेच्या तिकिटावर लढलेल्या नरेंद्र पाटील यांनी यावेळी केली होती. उदयनराजेंना विजय मिळाला पण मताधिक्यात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. याचा चांगलाच धक्का उदयनराजेंना बसला आहे. म्हणूनच ते म्हणाले होते की, ‘मताधिक्य कमी होणं हा एकप्रकारे माझा पराभवच आहे’.
उदयनराजेंनी भाजप प्रवेशावेळी अटही ठेवली होती. या अटीत ते म्हणले होते की, ‘खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक घ्यावी. पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी’. यावरून राजेंना आपण पराभूत होऊ शकतो, हि भीती आहे का याबाबत चर्चा रंगू लागली आहे. यंदा मात्र उदयनराजेंना आपला साताऱ्याचा गड राखणे आव्हानात्मक ठरणार आहे.
Visit : bahujannama.com