बहुजननामा ऑनलाईन टीम
कोरोना संकटकाळात विविध घटकांसाठी जाहीर केलेल्या आर्थिक योजना पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले. उत्पादन क्षेत्रात वृद्धीची चिन्हे असून ग्रामीण अर्थव्यवस्थेतही धुगधुगी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. ऑगस्टमधील जीएसटी संकलन समाधानकारक आहे, ई-वे बिल आकारणीत ऑगस्टमध्ये वाढ झाली असून पोलाद निर्यातीतही वृद्धी होत आहे, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.
लॉकडाउनच्या सहा महिन्यांत अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने कमी झाली नाहीत, तर त्यांचे स्वरूप बदलले आहे .अर्थमंत्रालय आता या परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देत मार्ग काढत आहे. कोरोना साथीमुळे गावाला गेलेले वस्त्रनिर्मितीसारख्या उद्योगातील परप्रांतीय कामगार पुन्हा कामावर येत आहेत. काही क्षेत्रांतील निर्यातही हळूहळू वेग घेत आहे. सध्याच्या देशांतर्गत मागणीपेक्षा परदेशातून मागणी वाढली असल्याचेही त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेने वेग घेतला असून तीची जोमदार वाढ झाल्याचे सांगितले. केवळ कृषी क्षेत्रातच नव्हे, तर अकृषक क्षेत्रांतील अर्थव्यवहारातही मोठी वाढ झाली आहे . मोठया क्षेत्रांतील उत्पादन घसरणीमुळे अर्थव्यस्थेचे झालेले नुकसान गेल्या तीन महिन्यांत भरून निघाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. जीएसटीच्या महसुलात वाढ झाली आहे. यंदाचे जीएसटी संकलन गेल्यावर्षीच्या ऑगस्टमधील 88 टक्के संकलनाच्या तुलनेत समाधानकारक आहे. ई वे बिल आकारणी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 97.2 टक्के होती. त्या तुलनेत यंदाही वाढ झाली आहे. आयएचएस मार्किट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) जुलैमध्ये 46 होता. तो ऑगस्टमध्ये सहा महिन्यांतील उच्चांकी पातळीवर- 52 वर पोहोचला आहे.