अहमदनगर : संबंध महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, अहमदनगर जिल्ह्यातही दुष्काळाची तीव्रता अधिक असून अशा परिस्थितीत माझ्या सत्कार सोहळयासाठी कोणताही खर्च करू नका. याऊलट हा खर्च कार्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा, असे आवाहन नवनिर्वाचित खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.
भाजपचे नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांचा गुरूवारी सायंकाळी कर्जतमध्ये सत्कार करण्यात आला. हा त्यांचा जिल्ह्यातील पहिला सत्कार होता. त्यावर यापुढे सत्कार नकोत. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आयोजित केलेला हा सत्कार असल्याने तो आपण स्वीकारतो. मात्र हा शेवटचा सत्कार समजावा आणि यापुढे कोणीही आयोजन करू नये, अशी भूमिका विखेंनी घेतली आहे.
सर्वसामान्य मतदार, जिल्ह्यातील महायुतीचे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक आणि विश्वासाने दिलेल्या पाठबळामुळे लोकसभा निवडणुकीत झालेलल्या विजयाचा आनंद व्यक्त होणे स्वाभाविक आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात वाढली असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचे मोठे आवाहन आपल्या सर्वांसमोर आहे.
या सर्व परिस्थितीत कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून आयोजित केले जाणारे सत्कार सोहळे तसेच सत्कारासाठी होणारा खर्च उचित नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी सत्कार सोहळ्यावर होणारा खर्च टाळून तो पैसा दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा,’ असं आवाहन त्यांनी केलं.