पुणे बहुजननामा ऑनलाईन – मुंढवा परिसरातून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा खून झाल्याचा प्रकार उघडकिस ला आहे. सोशल मिडीयावर ओळख झाल्यानंतर महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा पैशांसाठी खून करण्यात आला. पैशांसाठी तिला ताम्हीणी घाटात नेऊन तिचा खून केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी खून करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.
आनंद शिवाजी निकम (वय ३०, रा. वृंदावन कॉलनी, तापकिरनगर, काळेवाडी) असे अटक कऱण्यात आलेल्याचे नाव आहे. तर ४२ वर्षीय विवाहित महिलेचा खून करण्यात आला आहे.
मागील महिन्यापासून होती बेपत्ता
गेल्या महिन्यात २२ जूनपासून मुंढवा भागातील एक ४२ वर्षीय महिला बेपत्ता झाली होती. तिचा ठावठिकाणा न लागल्याने तिच्या मुलाने याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
फेसबुकवरून लागला छडा
महिला कुटुंबीयांना काही न सांगता अचानक बेपत्ता झाली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला होता. महिलेच्या फेसबुक खात्यावरून पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. फेसबुकच्या माध्यमातून महिला आनंद निकम याच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने निकमचा शोध घेण्यास सुरूवात केली.
कर्जबाजारी आरोपी
निकम गणेशखिंड रस्त्यावरील भोसलेनगर परिसरात चहाची टपरी असल्याची माहिती मिळाली. तो कर्जबाजारी झाला होता. त्याच्यावर २ लाख रुपयांचे कर्ज झाले होते.
निकम पिंपरीतील काळेवाडी भागात वास्तव्यास असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांचे पथक त्याच्या घरी गेले. तेव्हा निकम घरात नसल्याचे सांगण्यात आले. निकम पसार झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
ताम्हीणी घाटात नेऊन गळा चिरून खून
२२ जून आरोपी निकम महिलेला दुचाकीवरून घेऊन ताम्हिणी घाटात गेला. घाट परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी छायाचित्रे काढायची आहेत, असे त्याने तिला सांगितले होते. तेथे महिलेला धमकावून तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले. तिचे हातपाय दोरीने बांधले. तिच्यावर चाकुने वार करून खून केला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक आयुक्त सुनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव भोसले, उपनिरीक्षक अमोल गवळी, स्वप्नील पाटील, सोनवणे, चव्हाण, गायकवाड, जगताप, जाधव यांनी या प्रकरणाचा तपास केला.