सातारा : बहुजननामा ऑनलाइन – गत हंगामातील तुमचे उसाचे पैसे मिळण्यासाठी न्यू फलटण शुगरचे चेअरमन प्रल्हादराव साळुंखे पाटील यांना जाब विचारण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करीत शेतकरी जोपर्यंत आपल्या न्याय हक्कासाठी एकवटून पेटून उठत नाही, तोपर्यंत मोदी सरकार व फडणवीस सरकार खडबडून जागे होणार नाही. किंबहुना तुम्ही जोपर्यंत आपली वज्रमूठ आवळत नाही, तोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले.
साखरवाडी, ता. फलटण येथे शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत मार्गदर्शन करताना रविकांत तुपकर बोलत होते. यावेळी वाशिम जिल्हाध्यक्ष दामोदर इंगवले, मिथुन आटोळे, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हाद भोईटे, युवा आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, डॉ. रवींद्र घाडगे, तालुकाध्यक्ष नितीन यादव, सचिन खानविलकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उसाचे पैसे एकरकमी मिळाले पाहिजेत, एफ.आर.पी. संपूर्ण रक्कम ऊस गाळपास गेल्यापासून १४ दिवसात मिळालीच पाहिजे, न्यू फलटण शुगरबाबत शासनाने ठोस भूमिका घेतली पाहिजे, या व अन्य मागण्या मान्य होईपर्यंत साखर आयुक्त कार्यालयातून उठणार नाही, वेळ आली तर साखर आयुक्त कार्यालय पेटवून सुद्धा देऊ, असा निर्वाणीचा इशारा यावेळी तुपकर यांनी दिला. आमच्या भागात येऊन इकडची नेते मंडळी पश्चिम महाराष्ट्रात चांगली शेती आहे असे सांगण्याचा प्रयत्न करतात, मात्र आमच्यापेक्षा वाईट परिस्थिती इथे आहे.
आता आमच्या भागातील शेतकरी आत्महत्येचे लोण तुमच्याकडे आले आहे. आमचे शेतकरी दिवसा आत्महत्या करीत आहेत, तर तुमचे शेतकरी संध्याकाळी अंधारात आत्महत्या करीत आहेत, असे सांगत तुम्ही आत्महत्या करु नका, सरकारचे बरकडे मोडा. त्याशिवाय तुम्हाला उसाला चांगला दर मिळणार नसल्याचे तुपकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
खा. राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले नसते तर उसाला प्रतिटन १००० रुपये सुद्धा दर मिळाला नसता; कारण पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस सरकार एवढे क्रूर वाईट वागेल असे वाटले नव्हते. यांनी फक्त घोषणा केल्याचे नमूद करीत रविकांत तुपकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा एक व्हिडीओ चक्क उपस्थितांना ऐकवला आणि सांगितले की पहिल्या मिटिंगमध्ये कर्जमाफी करु, असे आश्वासन दिल्याचे सांगत कुठे गेली कर्जमाफी, असा सवाल करीत आता शेतकरी खवळला आहे. आता या लबाडांना घरात घुसून मारतील, असे सांगत तुम्ही सचिन तेंडुलकर चांगला खेळला म्हणून सोन्याची बॅट देताय आणि आमच्या शेतकऱ्याच्या हातात विषाची बाटली देताय, हा कसला न्याय, असा सवालही तुपकर यांनी उपस्थित केला.
दि. २८ जानेवारीचा साखर आयुक्त कार्यालयावरील रेकॉर्ड ब्रेक मोर्चा तर होणारच आहे. मात्र तुमच्या न्यू फलटण शुगरचा विषय अजेंड्यावर घेणार असून नऊ कारखान्याचा चेअरमन असलेल्या शिवसेनेच्या तानाजी सावंत यांच्याकडून एफआरपी घेतली. अशी ताकद स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आहे, त्यामुळे तुमचे पैसे घेतल्याशिवाय माघारी येणार नाही, अशी घोषणा रविकांत तुपकर यांनी या सभेत केली.