बहुजननामा ऑनलाईन टीम : कोरोनाच्या संकट काळात आपले पोलीस फ्रंटलाईनवर लढले. जी काही परिस्थिती नियंत्रणात आहे ती पोलिसांमुळेच आहे असे म्हणत मुंबई पोलिसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. एवढंच नाही तर कोरोनाच्या काळात आपण लॉकडाऊ केलं, निर्बंध लादले, वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला. क्षणभर मनात विचार आला पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर ? पण तसं झालं नाही. पोलीस फ्रंटलाइनवर काम करत होते म्हणूनच परिस्थिती नियंत्रणात आली. कोरोनाच्या लढाईत अनेक पोलीस शहीद झाले त्याबद्दल दु:ख आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पोलिसांची बदनामी करणाऱ्यांची तोंड बंद झाली
उद्धव ठाकरे म्हणाले, पोलिसांचे कर्तृत्व हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. त्यामुळे त्यांची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली असेही त्यांनी म्हटले. पोलिसांचे कर्तृत्व सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. त्यामुळे कुणी कितीही आदळआपट केली तरीही त्यावर डाग लावू शकणार नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे. तुम्ही दक्ष राहून काळजी घेता, जबाबदारी घेता त्यामुळे आम्ही आमचे सण साजरे करतो. त्यासाठी तुमचे धन्यवाद असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पोलीस सतत ताण-तणावात असतात. नववर्षाची सुरुवात माझ्या बहाद्दर कुटुंबीयांच्या समवेत उपस्थित राहून करावी या जाणिवेतून मी महाराष्ट्र आणि मुंबईच्या नागरिकांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. सर्व पोलिसांना मी हे सांगतो की, तुम्हा सर्वांना फक्त हेच वर्ष नाही तर येणारी अनेक वर्षे सुखाची, समाधानाची, भरभराटाची आणि ताणमुक्ततेची जावोत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.