नवीदिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – वर्ष २०१३ ते २०१७ या काळात दिल्लीस्थित जवाहर नवोदय विद्यालयात ( जेएनव्ही ) दलित-आदिवासींसह एकूण ४९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने ( एनएचआरसी ) केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला नोटीस बजावली आहे. एनएचआरसीने दिलेल्या माहितीनुसार, जवाहर नवोदय विद्यालयात २०१३ ते २०१७ या काळात ४९ पैकी ७ प्रकरणे वगळता इतर विद्यार्थ्यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्यांचे मृतदेह सहकारी तथा विद्यालयातील कर्मचाऱ्यांना आढळून आले आहेत. विविध कारणांनी विद्यार्थ्यांनी फाशी घेत जीवनयात्रा संपविली आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले असता एनएचआरसीने त्याची गंभीर दखल घेतली आहे. या घटनांवर तीव्र चिंता व्यक्त करीत एनएचआरसीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सचिवांना नोटीस जारी केली आहे. पुढील सहा आठवड्यांत स्पष्टीकरण देण्याचे एनएचआरसीने बजावले आहे. याचवेळी विद्यालयातील किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत त्यांना समुपदेशन करणारे प्रशिक्षित सल्लागार उपलब्ध आहेत काय ? अशी विचारणा मानवाधिकार आयोगाने केली आहे. कोणताही विद्यार्थी त्याच्या खोलीत एकटा असू नये किंवा त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी आहे काय ? विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी हॉटलाइनची सोय करून देता येईल काय ? याबाबत आयोगाने मंत्रालयाकडून खुलासा मागविला आहे. उल्लेखनीय बाब अशी की, आत्महत्या करणाऱ्यांमध्ये निम्मे विद्यार्थी दलित व आदिवासी समुदायाचे आहेत.