जालना : बहुजननामा ऑनलाईन – मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्यात आले असून स्वतंत्र सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) तयार करण्यात आला आहे. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मराठा समाजातील व्यक्तीला जातीचा दाखला काढून जातपडताळणी करून घ्यावी लागणार आहे. मात्र, जिल्ह्यात जात प्रमाणपत्र काढण्याच्या ऑफलाइन पध्दतीमुळे तहसील कार्यालयातून कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रकार वाढले असून, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागत आहे. त्यातच राज्यशासनाने मेगा भरतीची घोषणा केल्यामुळे नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर आरक्षणाचा लाभ कसा मिळणार, त्यासाठी जात पडताळणी करून घेणे आदींबाबत सुरुवातीला संभ्रम होता. त्यामळे शासनाने याबाबत स्वतंत्र आदेश काढला आहे.
मराठा समाजालाही इतर प्रवर्गाप्रमाणेच व प्रक्रियेप्रमाणे जात प्रमाणपत्र मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील जात प्रमाणपत्र नमुना’ असे यासाठीच्या अर्जावर स्पष्ट लिहिले आहे. जात प्रमाणपत्र काढण्यासाठी उमेदवाराला सुरुवातीला कॉमन स्व्हिहस सेंटर व महाईसेवा केंद्रावर अर्ज भरून या अर्जाची प्रिंट घेवून तहसील कार्यालयात सादर करावी लागत आहे.
एकच संचिका चार-पाच टेबलवरून जात असल्यामुळे कागदपत्रे व संचिका गाहाळ होण्याचे प्रकार घडत आहेत. शिवाय प्रमाणपत्र मिळण्यासाठी विलंब होत आहे. एसईबीसीचे प्रमाणपत्र काढणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक असल्यामुळे ही प्रक्रिया ऑनलाइन करावी, तसेच ठरावीक वेळेतच प्रमाणपत्र मिळावे याची खबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी मराठा समाजातील उमेदवारांकडून केली जात आहे.