इंदापूर : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे तीन पक्षांचे असून, यात कॉंग्रेस पक्षाला योग्य सन्मान मिळत नाही, असे त्यांच्या नेत्याच्या वक्तव्यावरून दिसते. त्यामुळे लवकरच कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पाडेल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State for Social Justice and Empowerment Ramdas Athawale) यांनी केला आहे.
भाजप नेते तथा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील निवासस्थानी आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. आठवले म्हणाले, महाआघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हिंदुत्व स्वीकारले की शिवसेनेने हिंदुत्व सोडून धर्मनिरपेक्षता स्वीकारली हे लवकरच सर्वांना कळणार आहे. पुढील 25 वर्षे महाविकास आघाडी सत्तेवर राहण्याचा दावा करत असले तरी त्यांच्यात सर्व आलबेल नाही. त्यामुळे घोडा, मैदान लांब नाही, हे सरकार पडले तर आमचे सरकार बनवण्याची तयारी आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने त्यामध्ये राजकारण सुरू झाले असल्याचेही ते म्हणाले.