मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाबाबत आडमूठेपणा न दाखवता आता शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar) यांनी मोदी सरकारला दिला आहे.
मुंबईत आज शरद पवार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राऊत यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना पवार यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहे.
पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे देशाच्या कृषी क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. या राज्यातील शेतकऱ्यांकडून पिकवला जाणारा गहू आणि तांदूळ केवळ देशातच नाही तर इतर 17 ते 18 देशांना निर्यात केला जातो. त्यामुळे पंजाब आणि हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी, असे पवार म्हणाले.
9 डिसेंबरला पुढील बैठक, तत्पूर्वी 8 डिसेंबरला शेतक-यांची भारत बंदची हाक
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतक-यांचे आंदोलन अजुनही सुरुच आहे.शनिवारी शेतकरी आणि सरकारमध्ये झालेली चर्चा देखील निष्फळ ठरली. त्यानंतर 9 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी जाहीर केे आहे. त्याआधी 8 डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांनी भारत बंद ची हाक दिली आहे.