बहुजननामा ऑनलाईन – कात्रज देहू रोड बाह्यवळण येथून नवले ब्रिजकडे येत असताना भरधाव ट्रकचा पुढचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. यात 4 कार व 8 दुचाकी वाहनांना उडवले आहे.
शुभम प्रकाश सुपेकर (वय २४, रा. आंबेगाव) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर, प्रकाश अशोक आरख (वय ३३, रा. उत्तमनगर), राहणे रवींद्र स्वामीलाल (वय ५५, रा. कोंढवे धावडे), नागनाथ भरत रदने (वय ३१, रा. कोंढवा), विलास सदाशिव जगताप अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर विठ्ठल तुकाराम झेंडे (वय ५०) इंद्रभान हिराजी शिंदे (वय ७०, सिंहगड), ऋतूराज इंद्रभान शिंदे (वय ३९), सिद्धार्थ अनिरुद्ध वेदपाठक (वय 28), चैतन्य बलवन्त अहिवळे (वय 28) व नागनाथ आगळे (वय 43) अशी किरकोळ जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ट्रक चालक (क्रमांक. एमएच. 12. एचसी. 7299) याच्यवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास मालवाहू ट्रक (एमएच १२ एचसी ७२९९) कोळसा घेऊन नवले ब्रीजच्या दिशेने जात होता. पोतदार स्कुलसमोर बाबाजी पेट्रोल पंपासमोर वेगातील ट्रकच्या पुढच्या बाजूचा डावा टायर पुâटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने रस्त्यावरील वाहनचालकांना चिरडले. त्यामध्ये ट्रकखाली सापडल्यामुळे दुचाकीस्वार शुभम जागीच ठार झाला. तर सातजण जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे एकच खळबळ होती. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, पोलीस निरीक्षक वसंत कुंवर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी धाव घेतली.
—चौकट—
शुभमवर काळाने घाला घातला…
शुभम याच्या वडिलांचा व्यावसाय आहे. त्यांचे नवले ब्रिजजवळ ऑफिस आहे. दरम्यान वाहनांमध्ये डिझेल टाकण्यासाठी शुभम व वडील पेट्रोल पंपावर आले होते. यावेळी डिझेल टाकल्यानंतर तो पावत्या आण्यासाठी यु टर्न घेऊन नवले ब्रिजकडे जात होता. पण काळाने त्याच्यावर घाला घातला आणि त्याचा या अपघातात मृत्यू झाला.
–चौकट–
असा झाला अपघात
सकाळची साडे आकरा वाजण्याच्या सुमारास कात्रज देहू रोड बाह्यवळण सतत रस्त्यावर गर्दी असते. त्यावेळी अचानक पाठीमागून एक ट्रक भरधाव वेगात बाबाजी पेट्रोल पंपासमोर आला आणि त्याचे पुढचे डाव्या बाजूचे टायर बस्ट झाला. त्यातच ब्रेक फेल झाले व त्याने समोर गर्दीमुळे हळू जाणाऱ्या वाहनांना उडविण्यास सुरुवात केली. त्याने समोर असणाऱ्या 4 कार व 8 दुचाकीना उडवले, असे प्रत्यक्ष दर्शीने सांगितले. यामध्ये दुचाकी ट्रक खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आणि एकच गोंधळ झाला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. प्रथम भारती विद्यापीठ वाहतूक विभाग घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना तात्काळ नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच क्रेनने द्वारे अपघात ग्रस्त वाहने वाजुला काढली. तसेच वाहतूक सुरळीत केली.