मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आपण आमदारकीचा राजीनामा का दिला याचा पवारांनी खुलासा केला. त्याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत बैठक घेतली होती. यात पवार कुटुंबातील सर्वजण उपस्थित होते. पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.
‘पवार कुटुंबात कोणताही गृहकलह नाही’
पवार कुटुंबात कोणताही गृहकलह नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलं आहे.अजित पवार म्हणाले, “माझ्या राजीनाम्यानंतर अनेक बातम्या समोर येताना दिसल्या ज्यात म्हटलं जात होतं की, पवार कुटुंबात गृहकलह आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो पवार कुटुंबात कोणताही गृहकलह नाही. आमचं कुटुंब मोठं आहे. तरी आजही आमच्या कुटुंबात ज्येष्ठाचा कुटुंबप्रमुखाचा निर्णय महत्त्वाचा असतो. जेव्हा मी राजकारणात आलो तेव्हा अशा बातम्या समोर आल्या होत्या. सुप्रिया सुळेंच्या वेळेसही हेच झालं. आता कदाचित पार्थ पवारांच्या वेळेसही असंच करतील.” असे अजित पवार म्हणाले.
या कारणामुळे दिला राजीनामा
राजीनाम्याबद्दल स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले, “सगळ्यांना न सांगता राजीनामा देऊन मी सर्वांना दुखावलं त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. माझ्या राजीनाम्यामुळे माझे हितचिंतक भावूक झाले होते. विवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला. माझा राजीनामा देणे चूक आहे किंवा नाही माहिती नाही. त्याच्या खोलात मी जाणार नाही. शरद पवार कोणत्याही सहकारी संस्थेचे संचालक नाहीत. शिखर बँकेशी पवारांचा काहीही संबंध नाही. ईडीच्या प्रेसनोटमध्ये पवारांचं नाव होतं. पवारांचं नाव पाहून मी अस्वस्थ झालो. आपल्यामुळे साहेबांना या वयात बदनामी सहन करावी लागते. यामुळे मी कोणालाही न सांगता मी राजीनामा दिला. फोन बंद करून मी मुंबईतच माझ्या नातेवाईकाच्या घरी होतो.
Visit : bahujannama.com