मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आपण आमदारकीचा राजीनामा का दिला याचा पवारांनी खुलासा केला. त्याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत बैठक घेतली होती. यात पवार कुटुंबातील सर्वजण उपस्थित होते. पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, “शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी शरद पवारांचा काहीही संबंध नाही. आम्हीही माणसं आहोत आम्हालाही मन आहे. सतत होणाऱ्या आरोपांमुळे त्रास होतो. अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले. पक्ष सोडलेल्यांवर मी कधीही टीका केली नाही.” असे बोलताना अजित पवारांना अश्रू अनावर झाले.
इतकेच नाही तर यावेळी बोलताना त्यांनी पवार कुटुंबात कोणताही गृहकलह नसल्याचे सांगितले. अजित पवार म्हणाले, “माझ्या राजीनाम्यानंतर अनेक बातम्या समोर येताना दिसल्या ज्यात म्हटलं जात होतं की, पवार कुटुंबात गृहकलह आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो पवार कुटुंबात कोणताही गृहकलह नाही. आमचं कुटुंब मोठं आहे. तरी आजही आमच्या कुटुंबात ज्येष्ठाचा कुटुंबप्रमुखाचा निर्णय महत्त्वाचा असतो. जेव्हा मी राजकारणात आलो तेव्हा अशा बातम्या समोर आल्या होत्या. सुप्रिया सुळेंच्या वेळेसही हेच झालं. आता कदाचित पार्थ पवारांच्या वेळेसही असंच करतील.” असे अजित पवार म्हणाले.
Visit : bahujannama.com