शिर्डी : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकी दरम्यान राज ठाकरेंच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला, मात्र सभांची गर्दी मतात परावर्तीत होवू शकली नाही. तसेच आघाडीला वंचितमुळे तब्बल ९ जागांवर फटका बसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ते साई दर्शनासाठी शिर्डीत आले होते. साईबाबांच्या दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी आघाडीसाठी मनसेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट करत मत विभाजन टाळण्यासाठी आपण वंचितला सोबत घेण्यास इच्छुक असल्याचेही सांगितले. यावेळी संस्थानचे सीईओ दिपक मुगळीकर, काँग्रेसचे डॉ. एकनाथ गोंदकर, राष्ट्रवादीचे निलेश कोते आदीची उपस्थिती होते.
थोरात म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व पुरोगामी शक्तींनी एकत्र यायला हवे. सध्या जे सत्तेत आलेत त्यांच्याकडून राज्यघटनेतील मुलभुत तत्वांना सुरूंग लावला जात असल्याने आपण काळजीत आहोत. या पार्श्वभुमीवर लोकशाही चांगली, सदृढ राहावी यासाठी बाबांना साकडे घातल्याचे थोरात यांनी सांगितले. सर्वांना सोबत घेण्याचे काँग्रेसचे तत्त्वज्ञान आहे. काँग्रेसचे विचार सर्वसामान्यांच्या अंतकरणात आहे. त्याला साद घालण्याचे काम करावे लागेल असे थोरात यांनी सांगितले.
सुजय विखे व बाळासाहेब थोरात यांनी एकाच विमानातून प्रवास केल्याचा फोटो वायरल झाल्याचे विचारले असता थोरात म्हणाले की, तो केवळ योगायोग होता, व्यक्तीद्वेशाला कधीही स्थान देत नसल्याने आपण खासदार विखेंच विजयाबद्दल अभिनंदन केले तसेच वडीलकीच्या नात्याने चांगले काम करण्याचा दिला.