कोलकाता : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणी ममता यांच्यातील राजकीय चकमक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. लोकसभेनंतर तृणमूल काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांवर तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी जोरदार हल्ला चढविला आहे. तृणमूल सोडून जाणारे सत्तेसाठी लोभी आणि भ्रष्ट असून भाजप सरकार कचरा गोळा करण्याचे काम करत असल्याचा आरोप ममतांनी केला आहे.
पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्याबद्दल त्या म्हणाल्या, जी लोक पक्ष सोडून जात आहेत ती देशद्रोही आहेत. त्यांच्याऐवजी आपण समर्पित कार्यकर्त्यांना स्थान देणार आहोत, ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय पण अजून प्रवेश केला नाही. त्यांनी लवकरात लवकर पक्ष सोडावा, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसचे तीन आमदार आणि अनेक नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. पक्ष सोडून जाणाऱ्या लोभी आणि भ्रष्ट नेत्यांचे आम्हाला सोयरसुतक नाही, त्यांनी जे कृत्य केले आहे त्याबद्दल कारवाई होईल म्हणून त्यांनी पक्ष सोडला आहे, असेही ममता म्हणाल्या.
कोणत्याही पक्षात प्रवेश केला तरी भ्रष्टाचाराच्या चौकशीतून कोणाचीही सुटका नाही, असेही ममता यांनी पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत सांगितले.