नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – विदर्भातील नागपूर आणि अकोला येथे दोन अपघात झाले आहेत. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नागपूरमध्ये बस-कंटेनरच्या धडकेत ७ वारकरी आणि अकोल्यात टेम्पोच्या धडकेत २ जणांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आज पहाटे नागपूर-भंडारा महामार्गावर लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या एका बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. अपघातातील सर्वजण नागपूरच्या गांधीबाग पोलीस क्वार्टरमधील रहिवासी असल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान, मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. हा अपघात अत्यंत भीषण होता. बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिल्याने बसच्या काचांचा चक्काचूर झाला. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर काचांचा खच पडला होता.
या अपघातात बसमधील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. या अपघातामुळे नागपूर-भंडारा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत.
दोन वारकऱ्यांचा मृत्यू
दुसरा अपघात आजसकाळी अकोल्यातील शेगाव येथे झाला. दोन वारकरी रस्त्यावरून चालत असताना पाठिमागून आलेल्या एका टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरू आहे.