मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात नाराज असलेले आणि सध्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्कात असणारे सहा ते सात आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.या आमदारांसोबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रवेशाबाबत चर्चा करतील,
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडीतील काही आमदार आमच्या पक्षात संपर्कात असून ते लोकसभेनंतर भाजपात येतील, असा दावा भाजपकडून सातत्याने केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखेंच्या संपर्कात असलेले आमदार हे मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर हे आमदार भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करतील. त्यामुळे लोकसभेत पानिपत झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.
दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे ते म्हणाले होते कि अनेक आमदार माझ्या सोबत भाजपात जातील. त्यामुळे काँग्रेसच्या काही आमदारांसह राधाकृष्ण विखे – पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झालं आहे. यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या नावाचा देखील समावेश आहे.